मुंबई/ मंगेश तरोळे पाटील : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन विना गणवेशाचा जाणार असून या स्वातंत्र्यदिनाला गणवेशाविना तिरंग्याला मानवंदना ! अश्या प्रकारचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे, अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाला अद्यापही गणवेश मिळाले नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, कंत्राटदाराच्या १०० रुपयांत गणवेश शिवून देणाच्या शोधात व शासनाच्या उदासीन धोरणामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनी वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली आहे.

ज्या कंत्राटदार हा कंत्राट दिला जातो त्यांना हे शालेय गणवेश कापड खरेदी करून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गटांद्वारे गणवेश शिवून शाळेत द्यायचे आहेत. मात्र, अद्यापही गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अपवाद वगळता बहुतेक शाळांना गणवेश मिळालेले नसून अनेक शाळा तर अद्याप १०० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्या बचतगटांच्या शोधात आहेत. त्यामुळे गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्येच ध्वजवंदनाला जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

यावेळी स्वातंत्र्यदिनाला विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा… तिरंग्याला मानवंदना देत होणारे संचलन… स्वातंत्र्यदिनी सर्वच शाळांमधील हे चित्र यंदाही दिसेल, मात्र त्याचा अविभाज्य भाग असलेल्या गणवेशाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल… बहुतांश शाळांपर्यंत अद्यापही गणवेश पोहोचलेला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *