मुंबई : राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. त्यामुळे पोकळ आश्वासनं नको, मदत करा अशी टीका वजा मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केलीय. एकिकडे अतिवृष्टीने हाहाकार अनं दुसरीकडे बळीराजाच्या डोळयात अश्रू …अशी परिस्थिती आहे.

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे नुकसान झाल्याची जी माहिती राज्य सरकारने दिली आहे ती अतिशय धक्कादायक असून यंदाच्या पावसाळ्या मध्ये 436 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे या पुराची आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाची भीषणता लक्षात येत असून मोठ्या प्रमाणात शेतीचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी खूप कठीण परिस्थिती मध्ये अडकलेला आहे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा अशी विनंती फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

मुख्यमंत्रयाची दिवाळी सुखाने जाऊ देणार नाही
अतिवृष्टीमुळे मराठवाडयासह विर्दभाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर पडून मराठवाडा आणि विदर्भात निर्माण झालेल्या पुरस्थिती आणि शेतीची पाहणी करावी अशी मागणी खासदार नवनीत कौर राणा यांनी केलीय. राज्यातील शेतक-यांची दिवाळी सुखात गेली नाही तर मुख्यमंत्रयांची दिवाळीही आम्ही सुखाने जाऊ देणार नाही असा इशाराही नवनीत कौर राणा यांनी दिला आहे.

शेतक-यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्रयाचे निर्देश

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *